आज मानवाने बुध्दीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती केली आहे. एकेकाळी असाध्य असणाऱ्या गोष्टी आज साध्य करून दाखविल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्र आणि मंगळासारख्या ग्रहांना देखील आपलेसे केले आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी औद्योगिकीकरणामुळे मदत झाली आहे. आज प्रत्येक देश आपला विकास कसा होईल आणि आपण कसे आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येऊ याचाच विचार करत आहे.
विकास तर केलाच पाहीजे, गरजा पूर्ण केल्याच पाहीजेत. पण तो कसा शाश्वत असेल याकडे देखील आवर्जून लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर आपण विकासाच्या लालसेपोटी मनमानीपणे पर्यावरणाचे शोषण करायला लागलो तर विकास पाहायला पृथ्वीवर माणूसच उरायचा नाही.
लालसेपोटी मानव पर्यावरणीय शृंखलेमध्ये हस्तक्षेप करत आहे, मानव देखील या पर्यावरणीय शृंखलेचा केवळ एक भाग आहे, पण मानवाने अतिरेकी हस्तक्षेप करून ही शृंखलाच विस्कळीत केली आहे. त्याचे परिणाम म्हणून कोरोना सारखी संकटं उद्भवत आहेत. या रोगावरील उपाय मानव शोधून काढेल देखील, पण हे असे रोग का उद्भवतात किंवा पुन्हा उद्भवू नयेत म्हणून काही करता येईल का यावरती विचार करण्याची गरज आहे.
त्यामुळे कितपत पर्यावरणामध्ये हस्तक्षेप करायचा यावरती विचार करायची वेळ आहे. नाहीतर आपलेच अस्तित्व संकटात यायला वेळ लागणार नाही, आणि कोरोना सारखे रोग हे त्याचे पुर्व संकेत आहेत.
-शिवाजी पाटील
-शिवाजी पाटील
Comments
Post a Comment