तरूणाई आणि तंत्रज्ञान..

       सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञान जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मुख्यत: तरूणांच्या दृष्टीने तर याला खुपच महत्त्व आहे, तरूणांना याचे आकर्षण जास्त असते. एकादे नवीन गँजेट, मोबाइल बाजारात आला की तरूणाई ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. तंत्रज्ञानाने जगामध्ये अनेक चमत्कार देखील घडविले आहेत. तरीदेखील सगळीकडे याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांवर चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडिया, मेसेज अॅप्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटासअँप यांच्या मुळे सगळे जगच जणू एक परिवार बनले आहे. (वसुधैव कुटुम्बकम्),म्हणजेच सगळे जग जोडले गेले आहे. घरात बसुनच अनेक कामे आँनलाईन करता येऊ लागली आहेत, जगात घडणाऱ्या घटनांची माहीती घरबसल्या मिळत आहे, एकप्रकारे तंत्रज्ञानाने जीवन सुलभ केले आहे. 

       अनेक क्षेत्रांना तंत्रज्ञानाने व्यापुन टाकले आहे. यामुळे अनेक फायदे झाले आहेत. पण सध्याची आपली तरूण पिढी ज्याप्रकारे याचा अनियंत्रित वापर करत आहे, त्यामुळे याचे अनेक चांगले परिणाम असले तरी वाईट परिणामच जास्त होताना दिसत आहेत. येथे आपण एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहीजे की, जेव्हा एखादे नवीन तंत्रज्ञान किंवा कोणतीही नवीन गोष्ट येते तेव्हा ती सोबत चांगले आणि वाईट परिणाम अशा दोन्ही गोष्टी सोबत घेऊन येत असते. ज्या प्रकारे आपण चांगल्या गोष्टी अगदी आनंदाने स्वीकारतो त्याचप्रमाणे वाईट गोष्टीं विरोधी लढण्याची तयारी देखील ठेवायला हवी. 

       मुख्यतः तरूणांचा ओढा तंत्रज्ञानाकडे जास्त असतो. आणि तरूणांचे प्रमाण देखील तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत जास्त आहे. त्यांना अपडेटेड राहायला आवडते. मग जर का बाजारात नवीन अपडेटेड गैजेट्स आले की, तरूण त्याकडे आकर्षित होतात, खरेदी करतात. (एकप्रकारे अर्थव्यवस्थेला हातभारच लावत असतात). फोन तर दिवसभर चालुच असतात, पण त्याचबरोबर नवनवीन गेम देखील येत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर, पब्जी सारखा गेम आज तरूणांचा आवड बनला आहे, आणि लाँकडाउन च्या काळात तर याचे प्रमाण खुपच वाढले आहे. 

       एकप्रकारे तरूण याच्या विळख्यात अडकत चालले आहेत. गेममुळे ते स्वतःला समाजापासून दूर करून घेतात (क्वारनटाईन, आयसोलेशन). समाजापासून दूर, म्हणजेच एकटे राहील्याने त्यांच्यामध्ये समाजाला सामोरे जायचा, वावरण्याचा आत्मविश्वास ऊरत नाही, त्यांच्या मनामध्ये न्युनगंड निर्माण होतो, समाजापासून तूटलेपण वाटू लागते, मग ते आत्महत्येचा भयानक मार्ग निवडतात. म्हणजेच तरूण एकप्रकारे या तंत्रज्ञानाचे गुलाम बनत आहेत. गुलाम बनला की माणूस स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी गमावून बसतो. तंत्रज्ञान आणि गुलामी यामध्ये एवढाच फरक असतो की, गुलामाला माहीत असते की आपण स्वतंत्र नाही आहोत ते, पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते कळतच नाही. वापरणारा एवढा यामध्ये गुंततो, की तो बाहेरचे जग विसरून आभाशी/कृत्रिम जगात जगू लागतो. 

       तंत्रज्ञानामुळे एकप्रकारे जग आपल्या मुठीत आले आहे. कुठेही न जाता घरी बसूनच अनेक कामे होत असल्यामुळे चालने कमी झाले आहे. त्यातूनच मग आरोग्यावरती शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम होताना दिसत आहेत(भारतात याचे प्रमाण वाढत आहे). तंत्रज्ञानामुळे अनेक संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत, पण त्याचा आपल्याला पुरेपुर वापर करता येत नाही. आपल्याला २४ तास देखील कमी पडत आहेत, कारण काय तर फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्राम, युट्युब, टिकटाँक यांचा भरमसाठ वापर. वाचणाची, लिखाणाची संस्कृतीचा तर विसरच पडत चालला आहे तरुणांना. मोकळा वेळ मिळाला की वेळ घालविण्यासाठी सोशल मीडियाला पसंती देतात. या सर्व गोष्टींमुळे डोळ्यांना समाधान मिळेल पण मनाला आणि आरोग्याला नाही. 

       आपली विचार शक्ति आणि रचनात्मकता देखील खुंटत चालली आहे. कारण आता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गूगल वरती मिळू लागल्याने, तरूण बुद्धीला जास्त ताण देण्यापेक्षा गूगल सारखा सोपा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे अवलंबित्व देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. फेसबुक वरती तासनतास अनोळखी लोकांसोबत चॅटिंग करणार्या तरूणाईला घरच्यासोबत बोलायला मात्र वेळ नाही, यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. आनंदाच्या व्याख्या देखील बदलत चालल्या आहेत, फेसबुकच्या लाईक्स वरती आनंद अवलंबून आहे. आणि जर का अपेक्षित लाईक्स नाही मिळाल्या की, त्यातुन मग औदासिन्य, नैराश्य, मानसिक विकृती येते. यातुन एक गोष्ट प्रतित होते होते की, तंत्रज्ञानाचे आपले अस्तित्व प्रत्येक ठिकाणी दाखवून दिले आहे. 

       आज तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. आँफिस पासुन ते अगदी घराघरा पर्यंत याची व्यापकता वाढली आहे. त्याचे परिणाम म्हणून, मग सायबर गुन्हे देखील वाढत आहेत, साइकोलॉजिकल प्रॉब्लेम्स वाढत आहेत, युवकांच्या मनावरती परिणाम होत आहे, फोनवर बोलत वाहन चालविण्यामुळे अपघात वाढत आहेत, सेल्फी मुळे कित्येक दुर्घटना घडल्या आहेत. निराशा वाढत आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे पोर्नोग्राफीच्या सारख्या अजस्त्र अजगराच्या विळख्यात तरूणाई अडकत आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतात याचे प्रमाण जास्त आहे. आणि लाँकडाईन च्या काळात तर खुपच वाढले आहे. एकप्रकारे विचार केला तर तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामापेक्षा वाईट कामांसाठी जास्त होत आहे. 

      जरी याचे अनेक दुष्परिणाम असले तरी तंत्रज्ञानाला आपण पुर्णपणे चुकीचे ठरवू शकत नाही कारण, ज्या प्रकारे सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते त्याचप्रमाणे तंत्रज्ञान देखील वापरणारा ते कसे वापरतो, यावरती त्याचे परिणाम अवलंबून असतात. तंत्रज्ञानाचा वापर शक्यतो आवश्यकते नुसारच केला पाहीजे. माणुस हा विवेकशील प्राणी आहे, तो आपल्या आपल्या विचार शक्तीच्या जोरावर विचार करून चांगले काय आणि वाईट काय हे ठरवू शकतो, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या नियंत्रित वापरासाठी तरूणांनी मनाच्या व्यवस्थापनाकडे देखील लक्ष दिले पाहीजे, म्हणजेच, ज्या प्रमाणे आपली गरज आहे, त्याप्रमाणे आपल्या मनाला नियंत्रित करून याचा वापर केला पाहिजे. एका मशीनला आपल्या मेंदू वरती ताबा मिळवू देण्यापेक्षा आपणच त्यावरती मर्यादा घालून त्याचा वापर कमी केला तर तंत्रज्ञान आपल्यासाठी शाप न ठरता एक वरदान ठरेल. 


-शिवाजी पाटील



Comments

  1. समर्पक, हा ब्लॉग देखील तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शक्य झाला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. होय सर तंत्रज्ञानाची कृपा, चांगल्यासाठी उपयोग

      Delete
  2. समर्पक, हा ब्लॉग देखील तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शक्य झाला आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...